जळगाव (प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणारा प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. जयभवानी नगर, मेहरूण) याचा खून झाल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह आढळून आल्याच्या अवघ्या काही तासांत मारेकऱ्यांना गजाआड केले आहे. या खुनाच्या मागे अनैतिक संबंधाचा संशय कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
हरवल्याची एमआयडीसी पोलिसात नोंद
प्रमोद हा जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) येथे दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामासाठी गेला होता. प्रमोद विद्यापीठात कॉन्टॅक्ट सिस्टीमवर काम करीत होता. परंतू तो सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. परंतू कुठेही प्रमोदचा तपास लागला नाही. त्यामुळे दि. 11 डिसेंबर रोजी वडील सुरेश हरी शेट्टी,( वय 63 वर्ष, रा. जयभवानी नगर, मेहरुण) यांनी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला हरविल्याबाबत तक्रार दिली. त्याप्रमाणे मिसींग दाखल करुन प्रमोदचा शोध सुरु होता.
मृतदेह आढळून आल्यानंतर उडाली खळबळ
याच दरम्यान, आज दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील निमखेडी शिवारातील कचरा फॅक्टरीच्या लगत असलेल्या महादेव मंदीराच्या मागील बाजुस एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी सुरेश शेट्टी यांनी जावून सदरचे प्रेत हे त्यांचा मुलगा प्रमोदचे असल्याचे ओळखले होते. प्रमोदचा खून झाल्याचे परिस्थितीजण्य पुराव्यावरुन दिसत असल्यामुळे जळगाव तालुका पो.स्टे. गुरनं. 357/2022 भादवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदरचा खून हा कोणत्या कारणांनी झाला व कोणी केला याची माहीती काढणे सुरु केले होते.
एमआयडीसी पोलिसांनी मिळाली आरोपींबाबत गुप्त माहिती !
यादरम्यान एम.आय.डी.सी. पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाला माहीती मिळाली की, सदरचा खुन हा सत्यराज नितीन गायकवाड (वय 26 वर्ष, रा. गणेश नगर, जळगाव) आणि सुनिल लियामतखाँ तडवी (वय 26 वर्ष, रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा) यांनी केला आहे. तसेच ते उमाळा (ता. जि. जळगाव) शिवारात असलेल्या जंगलात लपून बसले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व गुन्हे शोध पथकाचे स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छंगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील असे रवाना झाले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी प्रमोदचा खून केल्याचे कबुल केले. दोघां संशयित आरोपींना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप विभागीय अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मोठ्या दगडाने ठेचले डोके
प्रमोदचा गळा समोरून धारदार हत्याराने कापलेला होता. तसेच दोन्ही हातांवर ठिकठिकाणी व पाठीवर दोन ठिकाणी तसेच मानेवर कापीव व खोल गंभीर जखमा दिसत होत्या. तसेच त्याचे डोके मोठ्या दगडाने ठेचलेले होते. त्याचा संपूर्ण चेहरा व अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. त्यामुळे प्रमोदचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
अनैतिक संबंधाच्या संशयाने केला घात
सुमारे 2 वर्षापुर्वी प्रमोदच्या घरच्यांनी सुनिल तडवी यास घर भाडयाने दिले होते. त्याच्या घरी सत्यराज गायकवाड हा नेहमी ये-जा करीत होता. परंतू 6 महिन्यांपूर्वी सुनिल याने प्रमोद याच्याशी, “तु माझ्या पत्नीशी का बोलतो?. तिच्याकडे का पाहतो?, याकारणावरून भांडण केले होते. तसेच त्यानेच याबाबत एमआयडीसी पोलीसांत प्रमोदविरुध्द तक्रार दिली होती. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे प्रमोदच्या घरच्यांनी सुनिल याच्याकडून सहा महिन्यांपुर्वीच घर खाली करून घेतले होते. तेव्हापासून सुनिल हा प्रमोद याच्यावर खुन्नस ठेवून होता. एवढेच नव्हे तर तर अधुन मधून सुनील व त्याचा मित्र सत्यराज गायकवाड असे दोघेजण आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी देवून खुन्नस देत असतात, असे प्रमोदने आपल्याला वडिलांना सांगितले होते.
माझ्या बायकोचा पिच्छा सोड, नाहीतर तुला कायमच संपून टाकेन !
दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रमोद कामावरून घरी परत आला त्यावेळी सुनिल आणि सत्यराज या दोघांनी प्रमोदला घराजवळील रोडवर थांबवले होते. सुनिल याने, तू माझ्या बायकोचा पिच्छा सोडून दे नाहीतर तुला कायमच संपून टाकेन,अशी धमकी देवून शिवीगाळ केली होती. सदर घटनेबाबत प्रमोद याने घरी आल्याबरोबर आपल्या कुटुंबीयांनी सांगितले होते. दरम्यान, प्रमोद बेपत्ता झाल्या[पासून सुनील आणि सत्यराज हे देखील गायब होते. त्यामुळे प्रमोदचा खून या दोघांनीच केला असल्याचा कुटुबीयांनी व्यक्त केलेला संशय आज अखेर खरा ठरला.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरेंचा अनुभव आला कामी !
अवघ्या आठ दिवसापूर्वी जळगाव एमआयडीसी पोलीस स्थानकात हजर होऊन देखील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी खुनाचा उलगडा करण्यात मोठी भूमिका बजावली. गुप्त सूत्रांने मौखिक दिलेल्या माहितीला गंभीर घेत त्यांनी आपल्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. अगदी पथकासोबत स्वतः तपासात भाग घेत नेतृत्व देखील केले. यामुळेच अवघ्या काही तासात दोघां मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्थानकात अवघ्या काही दिवसांपूर्वी आले असले तरी, त्यांचा अनुभव आरोपींच्या शोधासाठी महत्वपूर्व ठरल्याचे यानिमित्ताने दिसून आले.