नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या झाडूने कमालच केली. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या शिरोमणी अकाली दल यांना जोरदार धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर आपने घेतलेली आघाडी आता बहुमताच्या फार पुढे गेली आहे.
पंजाबमध्ये आपने मिळवलेल्या या यशाची पाच कारणे
१) परिवर्तनासाठी ‘आप’
पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल- भाजप यांच्या आघाडीने आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता राखली होती. राज्यातील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकाली दलासोबत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मतदारांना काँग्रेस आणि अकाली दल एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे वाटले. पण यावेळी पंजाबमधील मतदारांनी परिवर्तनासाठी मतदान केले. राज्यातील दोन मोठ्या पक्षांना जनतेने गेल्या ७० वर्षात सत्ता दिली. पण जनतेला हवा असलेला विकास झाला नाही. त्यामुळेच यावेळी आपला मते मिळाली. यावेळी आम्ही फसणार नाही. भगवंत मान आणि केजरीवाल यांना संधी देऊ, अशी घोषणा आपने दिली आणि मतदारांनी त्याला प्रतिसाद दिला. राज्यातील जनता आतापर्यंतच्या राजकारणाला कंटाळले होते.
२) दिल्ली मॉडेल-
आपचे सर्वोच्च नेता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील मतदारांना दिल्ली मॉडलने प्रभावीत केले. दिल्लीत दिले जाणारे शिक्षण, आरोग्य सेवा, कमी दरात वीज यामुळे संपूर्ण देशभरात त्यांच्या कामाची चर्चा आहे. पंजाबमध्ये वीजेसाठी अधिक पैसे मोजावे लागतात तर आरोग्य आणि शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. अशाच दिल्ली मॉडेलचे त्यांना आकर्षण वाटले नाही तरच नवल.
३) युवक आणि महिला-
निवडणुकीच्या प्रचारात भाजपला राज्यातील युवक आणि महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. केजरीवालांनी स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार नष्ट करण्याचे वचन दिले. त्याच बरोबर शिक्षण आणि रोजगाराला चालना देणारी नवी व्यवस्था आणण्याचे आश्वासन दिले. महिलांच्या खात्यात दरमहा १ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासनाचा पक्षाला फायदा झाल्याचे दिसते. महिलांकडे एक स्वतंत्र वोट बँक म्हणून आपने पाहिले.
४) मुख्यमंत्र्याचा चेहरा-
भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून आपने बाहेरचा पक्ष अशी विरोधकांनी केलेली प्रतिमा काढून टाकली. राजकीय आणि सामाजिक घटनांवर भाष्य करणारे मान यांना पंजाबी लोकांच्या मनात खास स्थान आहे. त्याची प्रतिमा स्वच्छ आहे, तसेच ते अन्य पारंपारीक राजकारणापेक्षा वेगळे आहेत. इतक नाही तर मान भाड्याच्या घरात राहतात आणि गेल्या काही निवडणुकीत त्यांची संपत्ती कशी कमी होत चालली आहे या गोष्टी लोकांना भावल्या.
५) शेतकरी आंदोलन-
गेल्या एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने केंद्र सरकारला ३ वादग्रस्त कायदे मागे घेण्यास भाग पाडले. या आंदोलनाचा देखील विधानसभा निवडणुकीवर परिणाम झाला.