नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
“देशवासियांनी मांडलेल्या मतांबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मेजर ध्यानचंद हे भारताला सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या भारतातील महत्वाच्या खेळाडूंपैकी एक होते. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराला त्यांचं नाव देणंच योग्य आहे” असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, पुलेला गोपिचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस आहे.
हॉकीचे जादूगर म्हणून ध्यानचंद ओळखले जातात. त्यांनी १९२६ ते १९४९ या कालावधीमध्ये तब्बल ४०० आंतरराष्ट्रीय गोल केले. १९२८, १९३२ आणि १९३६ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. खेलरत्न पुरस्काराशिवाय क्रीडा क्षेत्रीतील जीवनगौरव पुरस्कारालाही पुरस्कारालाही ध्यानचंद यांचे नाव आहे. हा पुरस्कार २००२ साली सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमलाही २००२ साली ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.