जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या ४५३ पर्यंत खाली आली आहे.
जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या ३० च्या आत आली असून जळगाव शहरातील रुग्णसंख्या ४९, भुसावळ ३९, जामनेर ३५ तर चाळीसगाव तालुक्यातील रुग्णसंख्या ८२ इतकी आहे, जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होणे ही दिलासादायक बाब असून जिल्ह्यात सध्या अनलॉक टप्पा-३ चे नियम लागू असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हावासियांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या १२ हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले आहे. प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता ४५३ पर्यंत खाली आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी चौदा तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या ही पन्नासच्या आत आली असून एकमेव चाळीसगाव तालुक्यात ही रुग्ण संख्या ८२ इतकी आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखली महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलीस व महसुल प्रशासनासह आरोग्य व इतर शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना स्थानिक लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभत असून नागरीकांनी यापुढेही शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण
जळगाव शहर-४९, जळगाव ग्रामीण-२७, भुसावळ-३९, अमळनेर-१२, चोपडा-२२, पाचोरा-२३, भडगाव-६, धरणगाव-२७, यावल-२५, एरंडोल-२८, जामनेर-३५, रावेर-२६, पारोळा-२७, चाळीसगाव-८२, मुक्ताईनगर-१४, बोदवड-८ व इतर जिल्ह्यातील-३ असे एकूण ४५३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २७२ रुग्ण लक्षणे असलेले तर १८१ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. सध्या जिल्ह्यात रुगण बरे होण्याचे प्रमाण ९७.८७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे