पुणे (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण संदर्भात आतापर्यंत खूपदा बोललो. त्याच-त्या मागण्या मांडून कंटाळलो. महाराष्ट्राला पेटवणे दोन मिनिटांचे काम आहे. पण आपल्याला ते करायचे नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर समाजाला शिस्त आणि संयम बाळगावा लागेल, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाची आरक्षण संदर्भात राज्यस्तरीय व्यापक बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यात संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाहीय, असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं. वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.
सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही आरक्षणात काहीही करू शकणार नाही. ज्या लोकांना समाजाबद्दल काही माहिती आहे असे लोक सदस्य पाहिजेत, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. माझी बाजू मांडण्याची भूमिका मी घेत आहे, आरक्षण अनेक दिवस चालेल पण आपल्या मागण्याच काय?, असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांसोबत २२ मागण्यांसाठी बैठक झाली, मात्र अजून यात काहीच केलं नाही, आता सरकारने वसतिगृह बाबत जीआर काढून दाखवावा, आता दोन महिने झालेत, असंही संभाजीराजे म्हणाले.