पाटणा (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीच्या संथ मतमोजणीमुळे सध्या राज्यातील चित्र तसेच बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी १३१ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर महागठबंधन १०२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सध्या वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
भाजपप्रणीत एनडीए आघाडीवर असली तरी ही परिस्थिती किती काळ टिकेल, हे कोणत्याच राजकीय तज्ज्ञाला कळेनासे झाले आहे. एकेकाळी बिहारमध्ये डाव्या पक्षांचे प्रचंड प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांची संख्या लक्षणीयरित्या घटली होती. मात्र, यंदाची निवडणूक डाव्या पक्षांसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. याचा फायदा महागठबंधनलाही मिळणार आहे. प्रचाराच्या काळात महागठबंधनचा आर्थिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पसरवण्यात डाव्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एक्झिट पोल्सनी या निवडणुकीत डाव्या पक्षांना १२ ते १६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १९ जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याने हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मात्र, या सगळ्यात डावे पक्ष मात्र चांगलेच खुशीत आहेत. कारण, डाव्या पक्ष लढवत असलेल्या २९ जागांपैकी २० जागांवरील उमेदवार आघाडीवर आहेत. राजद आणि काँग्रेसच्या यांच्या महागठबंधनमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सहभागी झाले होते. या पक्षांकडून अगिआव, अराह, अरवाल, बलरामपूर, बिभुतीपूर, दाराउली, दराऊंधा, दुमराव, घोसी, करकट, मांझी, मथिहानी, पालीगंज, तरारी,वारिसनगर, झिरादेई, बचवारा आण बखरी या जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.