नाशिक (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी झटकताय. पण मराठा समाजाला याचं घेणे-देणे नाही. टिमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहे. मी छत्रपतींचा वंशज, मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यातच संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. संभाजीराजे म्हणाले’ मराठा आरक्षणा संदर्भात राज्यात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी पासून पळ काढत आहे. मात्र आमच्या मराठा समाजाला याचे काहीच घेणे देणे नाही. माझ्या भूमिकेवरही बोट ठेवत जात आहे. मी छत्रपतींचा वंशज, मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.
‘मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार या आधी मार्ग काय काढणार? हे सांगा. मी महाराष्ट्र पिंजून काढतोय, अभ्यासू लोकांशी चर्चा करतोय. त्यामुळे येत्या २७ मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. सगळ्या आमदार, खासदारांना माझी वार्निंग आहे, मराठा समाजाला विनंती आहे की, २७ मेपर्यंत शांत राहा, असं आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.
जे हातात आहे ते करा, हे माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. नोकरी देण्यात काय अडचण आहे. सारथीला दिलेलं, शाहू महाराजांचे नाव काढून टाका. आताच्या सरकारची भूमिका अयोग्य आहे, अशी टीकाही संभाजीराजे यांनी केली.
माझी भूमिका ही समाजाची भूमिका आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ वेळा भेटीसाठी परवानगी मागितली. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका, समाजाला दिलासा द्या. आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. मला आक्रमक व्हायला २ मिनिटं लागतील. १०२ व्या घटनादुरुस्तीवर २७ मे रोजी बोलणार, असंही संभाजीराजे म्हणाले.