बोदवड (प्रतिनिधी) बोदवड तालुक्यातून जामनेर तालुक्यात जाणारा राज्य महामार्ग ४६ चे जामठी ते बेटावद मार्गे फरदापुर भागाचे रस्त्याचे रुंदीकरण काम निकृष्ट पद्धतीने होत आहे. विशेष म्हणजे याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहे.
हा रस्ता जामनेर तालुक्यातील नागरिकांना जामठी व बोदवड बाजारपेठ जवळ पडत असल्याने सोयीचा आहे तसेच हा रस्ता पुढे रांजणी ,नांद्रा हवेली ,मार्गे फरदापुरला जळगाव-औरंगाबाद रस्त्यास जोडणारा असल्याने मुक्ताईनगर ,बोदवड तालुक्यातील लोकांना जवळचा मार्ग आहे. आधीच दुर्लक्षित असलेल्या या मार्गाचे काम सुरू झाले याचा आनंद लोकांना झाला होता. परंतू हे काम अतिशय खराब होत आहे आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतेही लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. लवकरच तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलन करून काम बंद पाडू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.