नाशिक (वृत्तसंस्था) मी शिवसेना आणि काँग्रेस सोडली नसती तर आज मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो, असा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
काँग्रेस नेतृत्त्वानं एकेकाळी संपर्क करुन आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे. मात्र ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता,असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. पण ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे. शिवसेना सोडण्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. मातोश्रीवर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते, असंही भुजबळांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदापेक्षाही ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे, असं ते म्हणाले. शरद पवारांसोबत काँग्रेस सोडतानाही दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदासाठीची संधी चालून आली होती. तेव्हा विलासराव देशमुख विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, हे देखील भुजबळांनी सांगितलं आहे.