मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. जर या आंदोलन अथवा संपात सहभागी झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर कर्मचारी- कामगारांमधल्या असंतोषाचा उद्रेक होईल, असं राज ठाकरे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात की, कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, ‘एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिन करा’ ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे. ज्या आगारांमध्ये काम सुरू आहे, तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत, ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना ‘सेवा समाप्ती कारवाई करण्यात येईल’ अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचा भडका उडाला आहे, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. ‘एसटी कर्मचारी कामगार जगला, तरच एसटी जगेल’ हे भान बाळगण्याची, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.