धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेले वादग्रस्त अतिक्रमण काढतांना आम्हाला शांतता कमेटीच्या बैठकीत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून आमची आस्था व श्रद्धेला पायदळी तुडविलेले आहे. तसेच भारतीय संविधान व घटनाबाह्य कार्य केलेले आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र राज्य वफ्क अधिनियमांचेही सर्रास उल्लंघन करण्यात आलेए. त्यामुळे आमच्या आस्था व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या धार्मिक स्थळाची पुर्नस्थापना येत्या ८ दिवसांत करून मिळावी, अन्यथा मला नाईलाजास्तव आमरण उपोषण करावे लागेल, असा ईशारा राष्ट्रावादीचे माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी दिला आहे.
धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवरील अतिक्रमण काढतांना आमचा विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील जागेवर पूर्वीप्रमाणे तावीज (समाधी) बांधण्याची स्वखर्चातून परवानगी देण्यात यावी. कारण तेथील मजार ही स्वतंत्रपूर्वीच्या काळातील होती. याबाबतच्या नोंदी सरकारी दप्तरी देखील आहेत. याठिकाणी माझ्या धार्मिक भावना जुडलेल्या आहेत. अतिक्रमण काढतांना आमचा विश्वासघात करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच निवेदन दिल्यापासून पुढील ८ दिवसात सदर जागी पुन्हा तावीज (समाधी) बांधण्याची स्वखर्चातून परवानगी न दिल्यास कॅन्सरग्रस्त रुग्ण असूनही मला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा राष्ट्रावादीचे माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच प्रांतधिकारी,तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिल्याचे म्हटले आहे.