मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे विरोधकांनी योगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांना बोलू न देणे आणि राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीवर झालेला हा सामूहिक बलात्कार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘गांधी कुटुंबाने देशासाठी रक्त सांडले आहे. बलिदान दिले आहे. याचा विसर जर कुणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही’,अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. ‘ज्या प्रकारे उत्तर प्रदेश पोलीस हे राहुल गांधी यांच्याशी वागत होते. त्यांची कॉलर पकडली आणि जमिनीवर पाडले. हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारे नाही. एका मुलीवर बलात्कार करून खून झाला. त्यासंदर्भात आवाज उठवायचा नाही. ही कुठली लोकशाही आहे. राहुल गांधी सारख्या नेत्याला कॉलर पकडून खाली पाडायचे की कोणती लोकशाही आहे. माझ्या मते हे या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हा सामूहिक बलात्कार आहे’ असं परखड मत राऊत यांनी व्यक्त केलं.