धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रण काढल्यानंतर बुधवारी रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लावण्यात आलेला आहे. त्यामुळेअत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्यानुसार आजचा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.
गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी प्रशासनाने अतिक्रमण काढले होते. तर रात्री पासून संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे आज होणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्यात आला आहे.
सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई !
धरणगाव पोलीस रस्तावरच नव्हे तर सोशल मिडीयावर देखील करडी नजर ठेऊन आहेत. सोशल मिडीयावर कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे कुणीही वाद निर्माण होईल असे, फोटो फेसबुक किंवा व्हाटसअपला ग्रुपला टाकून नयेत किंवा स्टेटस ठेऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक ईशारा देखील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिला आहे.
शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला आहे. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी कर्तव्यावर आहेत. तसेच संचारबंदी असल्यामुळे संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप राहणार आहे.