कोलकाता (वृत्तसंस्था) आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. परंतू नंदिग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत.
ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या देणार का हे पहावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच भाजप आणि तृणमूलमध्ये काँटे की टक्कर बघायला मिळाली. दोन्ही पक्षांमध्ये अतिशय कमी जागांचं अंतर होतं. मात्र तृणमूलनं शंभरी पार करताच जोरदार मुसंडी मारली. आता तृणमूल काँग्रेस पक्ष २०० च्या जवळ पोहोचला आहे. तर शंभरी पार केलेला भाजप आता खाली येताना दिसत आहे. एका तृणमूल काँग्रेसनं जोरदार आघाडी घेतली असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी मात्र अडचणीत आल्या आहेत.
नंदिग्राममधून निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी सध्या ७ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले ममता यांचे माजी सहकारी सुवेंदू अधिकारी विद्यमान मुख्यमंत्र्यांना कडवी लढत देत आहेत. भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार पिछाडीवर असताना अधिकारी यांनी मात्र नंदिग्राममध्ये आघाडी घेतली आहे. अधिकारी ममता सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. मात्र निवडणुकीआधी त्यांनी कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींनी सुवेंदू यांना आव्हान देताना केवळ एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ममता यांचा पराभव झाल्यास तृणमूलसाठी तो मोठा धक्का असेल.
















