कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या तळई येथे दि. ९ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान दोन वेगवेगळ्या भागात विज पडून दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
यापैकी विक्रम दौलत चौधरी (वय ५५) यांच्या डोक्यावर विज पडल्याने डोके फाटून जागीच ठार झाले. विक्रम चौधरी हे पाऊस सुरु असल्याने घरी परत येत असतांना घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात ठार होऊन पालथे पडलेले होते. अशा अवस्थेत मागून येणाऱ्या मजूर महिलांनी त्यांना पाहिल्यावर त्यांनी गावात सांगितले. त्यांचे शवविच्छेदन कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत दि. ९ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान ब्राम्हण मळा भागातील स्वतःच्या शेतात गेलेला भुषण अनिल पाटील (वय १८) आकारावी पास झालेला तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ व आई वडिलांचा एकुलता एक मुलगा भोकरच्या झाडाखाली आठ जणांच्या घोळक्यामध्ये मधोमध बसलेला भुषण याच्या अंगावर वीज पडल्याने तो जागेवर बेशुद्ध होऊन त्यास बेशुद्ध अवस्थेत तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन गेले. त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासले असता मयत घोषित केले. त्याचे शवविच्छेदन एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई- वडील व एक विवाहित बहीण व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.
भुषण याच्या सोबत आजूबाजूच्या शेतात काम करणारे रमेश कौतिक धनगर (वय ६५), योगेश रविंद्र धनगर (वय १८), निवृत्ती रमेश धनगर (वय ३५), संदीप वामन वाघ (वय ३५), सुरेश हरी पाटील (वय ३२), बापू आनंदा धनगर (वय ४२), विजय नामदेव नाईक (वय २६) हे सर्व भुषण याच्यासोबत गोविंदा गिरधर धनगर यांच्या शेतातील भोकरच्या झाडाखाली पाऊस सुरु असल्यामुळे थांबलेले होते. अशातच विज कडाडून ती सरळ भुषणच्या अंगावर पडली त्यामुळे त्याच्या सोबत असलेल्यांपैकी रमेश धनगर यांच्या छातीवरील केस जळाले तसेच त्यातील उर्वरितांना किरकोळ इजा झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले. सदर गावात दोन्ही दुःखद घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
















