मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत, असं राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी तिथपासूनच नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी राज्य सरकारवर टीका करतानाच नारायण राणेंनी जनतेसाठी भाजपा आशेचा किरण असल्याचं म्हटलं. “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे”, असं राणे म्हणाले.
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली”, असं ते म्हणाले.