वर्धा (वृत्तसंस्था) शेतात काम करीत असताना सर्प दंश झाल्याने एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खडका येथे घडली आहे. अरुण सदाशिव वानखडे (वय ५४), असे मयत शेतमजुराचे नाव आहे.
अरुण वानखडे हे भूमिहीन असल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात काम करीत होते. दि. ४ सप्टेंबरला शेतात काम करीत असताना सर्प दंश झाला. परंतू सर्प दंश झाला हे त्यांच्या लक्षात आले नाही. ते शेतातून घरी परत आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी प्रथम आर्वी येथील सरकारी रुग्णलयात नेले. येथील डॉक्टरांनी अमरावती येथे नेण्यास सांगितले.
अरुण वानखेडे यांना अमरावती येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तेथे त्यांचा दि. ५ सप्टेंबरला रात्री ११ वाजता मृत्यु झाला. सर्प दंश झाल्याचे वेळीच लक्षात आले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. मयत अरुण वानखेडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. दरम्यान, घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.