बीड (वृत्तसंस्था) बीड जिल्ह्याच्या वेरूळ सावंगी गावात वीज पडून दोन महिलांसह दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. काजल विकास माळी (२३, रा.केरुळ ) आणि राणी (ताई) संदीपान सावंत (३५, रा.सांगवी आष्टी) असे मृत शेतकरी महिलांचे नाव आहे.
आष्टी तालुक्यात बुधवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी सहा वाजेदरम्यान केरुळ येथे शेळ्या चारत असलेल्या काजल विकास माळी यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सांगवी आष्टी येथील राणी (ताई) संदीपान सावंत या माहेरी हिंगणी येथील शेतात काम करताना अंगावर वीज कोसळून मृत्यूमुखी पडल्या. यासोबतच पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी देखील जागीच मृत झाली आहे. अवकाळी व गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.