नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-स्नातक’ अर्थात ‘नीट-यूजी’ परीक्षेचा पेपर फुटणे व परीक्षेतील अनियमितेच्या मुद्द्यावरून संसदेत शुक्रवारी विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. या मुद्द्यावर तत्काळ चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी एकमुखाने केली. याप्रश्नी त्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील हौद्यात येऊन घोषणाबाजीसह मोठा गोंधळ घातला. तर राज्यसभेचे सभापती आम्हाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १३ माजी खासदारांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. काही मिनिटांचे मौन बाळगत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ‘नीट-यूजी’ पेपरफुटीचा मुद्दा उचलून धरला व तत्काळ चर्चेची मागणी केली. पण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांनी स्वतःचे म्हणणे सविस्तरपणे मांडावे. आम्ही सध्या स्थगन प्रस्तावाची नोटीस विचारात घेऊ शकत नाही, असे अध्यक्षांनी सांगितले. त्यावर समाधान झाले नसल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, आम्ही देशातील विद्यार्थ्यांना सरकार व विरोधकांकडून संयुक्त संदेश देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणूनच नीट प्रश्नी चर्चा करण्याची राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिलेश यादव व इतर नेत्यांनी राहुल यांच्या सुरात सूर मिसळला. परंतु, ओम बिर्ला यांनी चर्चेला परवानगी दिली नाही. यावेळी विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. त्यामुळे पहिल्यांदा कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झाले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दुसरीकडे, राज्यसभेतही ‘नीट-यूजी’चा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी नियम २६७ नुसार, चर्चेसाठी २२ नोटीस दिल्या. ‘नीट-यूजी’तील अनियमितता, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे (एनटीए) अपयश व पेपर लिक संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली.
राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर लिक झाल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे. परंतु सभापती जगदीप धनखड यांनी चर्चेची मागणी फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. पहिल्यांदा १२ व त्यानंतर दुपारपर्यंत कामकाज स्थगित झाले. वरिष्ठ नेत्यांनी राज्यसभेत गदारोळ घालण्यावर सभापतींनी नाराजी व्यक्त केली. याचदरम्यान सभापती विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत. मला अपमानित करण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप खरगे यांनी केला. त्यानंतर सर्व विरोधकांनी सभात्याग केला.