अमळनेर (प्रतिनिधी) येथील दि अर्बन को ऑपरेटिव्ह बँक गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शी व्यवहार आणि आवश्यक त्या सुविधांमुळे नावाजलेली असताना आता पुन्हा बँकेला अखिल भारतीय युनिट बँक्स प्रकारात बँको ब्लु रिबन २०२० हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच ही बँक आता संपूर्ण भारतात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावारूपाला आली आहे.
पुरस्काराचे पत्र प्राप्त होताच बँकेत संचालक मंडळ व कर्मचारी वृंदानी पेढे वाटून आनंद साजरा केला. अविज फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर झाला असून या संस्थेच्या संपूर्ण भारत भरातील सहकारी बँका सभासद आहेत. बँकांच्या उन्नतीसाठी विविध प्रोत्साहनपर योजना या संस्थेच्या वतीने राबविल्या जात असतात आणि दरवर्षी बँको ब्लु रिबन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार विजयी होणाऱ्या बँकेस समारंभपूर्व प्रदान केला जात असतो. अमळनेर अर्बन बँक या संस्थेची सभासद असताना गेल्या १५ वर्षांपासून बँकेतर्फे या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केला जात होता. तसेच हा प्रस्ताव २०२० साली देखील बँकेने सादर केला होता. यात पुरस्कारासाठीचे सर्व निकष बँकेने पूर्ण केल्याने मानाचा हा पुरस्कार अर्बन बँकेने जिंकला असून मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यात म्हैसूर येथे सहकारी बँकांसाठी आयोजित तीन दिवसीय बँको ब्लु रिबन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अशी आहे पुरस्कारप्राप्त अर्बन बँकेची कामगिरी
अमळनेर अर्बन बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून लांभांश वाटप थांबले असताना २०१६ च्या निवडणुकीनंतर विद्यमान संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदाच्या परिश्रमाने दरवर्षी ५० ते ८५ लाख नफा झाल्याने गेल्या चार वर्षांपासून नियमित लाभांश वाटप सुरू आहे. याशिवाय संचालक मंडळाने बँकेची थकबाकी (एनपीए प्रमाण) प्रमाणात आणले असून होणारा खर्च देखील काटकसरीने कमी केला आहे. बँकेत सोलर युनिट (सौरऊर्जा प्रकल्प) सुरू झाल्याने दरमहा २० हजार पर्यंत विजबिल बचत झाली आहे. याशिवाय पर्यावरण समतोलही राखला गेला आहे. पाच वर्षात ११ कर्मचारी कमी होऊनही कमी कर्मचाऱ्यांवर ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा दिली गेली आहे. बँकेच्या कर्जधोरणात लहान व्यापारी नजरेसमोर ठेऊन ५० हजार ते ३ लाखापर्यंत दैनिक कर्जवाटप सुरू केल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली, कर्जदार सभासद मयत झाल्यास वारसांना नियमात असेल तेवढी सूट देऊन कर्जवसुलीचे उद्दिष्टय साध्य केले. कोरोना काळात बँक व्यवहार सुरळीत ठेऊन सभासदांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. अमळनेरात नागरिकांसाठी मुख्य चौकात सॅनिटाईज बूथ बसविला. आर्थिक स्पर्धा असताना बँकेने एटीएम सेवा सुरू केली तसेच दरवर्षी सभासद पाल्यांच्या गुणगौरवाची परंपरा कायम ठेवली, सभासदांच्या मागणीनुसार तीन नवीन लॉकर कॅबिनेट उपलब्ध केल्यानें जिल्ह्यात सर्वाधिक लॉकर आणि वाजवी भाडे असणारी ही बँक ठरली आहे. पोलिस विभागाच्या मागणीस अनुसरून बँकेच्या चारही बाजूला अतिरिक्त सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने बँकेसह शहराच्या सुरक्षीतेतही वाढ झाली आहे. या योगदानाबद्दल बँकेस पोलीस विभागाचे आभारपत्र प्राप्त झाले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सायबर क्राईम वाढले असताना रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सायबर सुरक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा बँकेने कार्यान्वित केल्याने बँकेचा ग्राहक डेटा पूर्णपणे आज सुरक्षित झाला आहे.
पुरस्काराबद्दल बँकेत आनंद व्यक्त करताना विद्यमान चेअरमन अभिषेक पाटील, व्हा चेअरमन प्रवीण पाटील, संचालक मोहन सातपुते, प्रविण जैन, पंडीत चौधरी, लालचंद सैनांनी, भरत ललवाणी, पंकज मुंदडा, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, मिराबाई निकम, वसुंधरा लांडगे, तज्ञ संचालक अँड रमाकांत माळी, गणेश बाविस्कर, मॅनेजर अमृत पाटील यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते. दरम्यान सदर पुरस्कारामुळे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सभासद आणि ग्राहक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.