संबलपूर (वृत्तसंस्था) लग्न करुन परतताना कालव्यात वाहन कोसळल्यामुळं वराच्या बाजूचे सात जण ठार, तर चार जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात घडली आहे. ही घटना आज (शुक्रवार) पहाटेची असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय.
झारसुगुडा जिल्ह्यातील लद्दारा गावातून वराचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना घेऊन जाणारं वाहन गुरुवारी संध्याकाळी संबलपूरमधील परमपूर भागात गेलं होतं. रात्रीचं जेवण आटोपून वराच्या पक्षातील काही सदस्य एसयूव्हीमधून घरी परतत होते. यादरम्यान चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि पहाटे दोनच्या सुमारास वाहन कालव्यात कोसळलं.
वाहन अंगावर पडल्यामुळं सात जणांचा मृत्यू झालाय. या हृदयद्रावक घटनेत अन्य चार जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ, सुमंत भोई, सुबल भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावं आहेत. सातव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना संबलपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.