जळगाव ( प्रतिनिधी ) – आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे वीज क्षेत्रात क्रांती घडतेय. ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतोय; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे. जळगाव परिमंडलातील 3 लाख 25 हजार 336 घरगुती ग्राहकांना आतापर्यंत अडीच कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
ग्राहकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा गतवर्षीच्या जुलै महिन्यापासून सुरू झाला.
जळगाव परिमंडलात 3 लाख 25 हजार 336 घरगुती ग्राहकांना जुलै-2025 ते मार्च-2026 या नऊ महिन्यांच्या वीजबिलात 2 कोटी 56 लाख 94 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली. जळगाव मंडलातील 2 लाख 6 हजार 683 ग्राहकांना 1 कोटी 46 लाख 1 हजार रुपये, धुळे मंडलातील 73 हजार 805 ग्राहकांना 61 लाख 34 हजार रुपये तर नंदुरबार मंडलातील 44 हजार 848 ग्राहकांना 49 लाख 64 हजार रुपये सवलत मिळाली.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमुळे योग्य रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. यात 1 जुलै 2025 ते मार्च 2026 मध्ये 80 पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. पुढील तीन आर्थिक वर्षात ही सवलत वाढत जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवणे आवश्यक आहे.
ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
















