नागपूर (वृत्तसंस्था) RSSलाही जनाब संघ म्हणायचं का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली, असा सवाल त्यांनी केला आहे. मुस्लिमांचा डीएनए हिंदूच आहे असे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले होते. त्यांनाही जनाब म्हणणार का असा टोला त्यांनी मारला.
शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. त्यानिमित्त संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जनाब हा शब्द मुसलमानाला म्हणतात. त्यांचे हजारो मतदार हे भाजपला मतदान करत असतील. एक हिंदूत्वाची विचारधारा घेऊन जाणारी संघटना म्हणजे आरएसएस नागपुरात आहे. सरसंघचालकांचे गेल्या काही काळातील वक्तव्य पाहिली तर तुम्ही संघालाही जनाब संघ म्हणणार का? मोहन भागवतांनी सर्वांचा डीएनए एकच आहे असं म्हटलं होतं? म्हणून ते जनाब संघाचे प्रमुख झाले का?, असं संजय राऊत म्हणाले.
‘तपास यंत्रणा भाजपचे कार्यकर्ते’
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणांच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. ईडीने ममता बॅनर्जींच्या भाच्याला चौकशीसाठी बोलावलं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय नागरिकाला ईडीचं भय दाखवलं. तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागतात. आम्ही दिल्लीसमोर अजिबात वाकणार नाही, मोडण्याचा तर प्रश्नच सोडा, असं संजय राऊत म्हणाले.