पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील वरसाडे येथील शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (वय २५) यांचे दुपारी शेतात काम करत असताना दुदैवी मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिल रोजी घडलीय.
वरसाडे तांडा येथील भूमीहीन शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी व दोन मुलांसह एकत्रित कुटुंबात राहत होते. प्रेमसिंग चव्हाण हे कधी शेतमजूरी तर कधी जेसीबी चालकाचे काम करायचे दरम्यान, १० एप्रिल रोजी प्रेमसिंग चव्हाण हे नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करत असतानाच दुपारी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध होऊन प्रेमसिंग चव्हाण हे अचानक जमीनीवर पडले. हे पाहून सोबतच्या मजूरांनी त्यांना उचलून सावलीत नेले. तसेच त्यांना आणण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तसेच शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु, प्रेमसिंग चव्हाण यांची हालचाल पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे प्रेमसिंग चव्हाण यांना त्यांच अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ. नितिन चव्हाण यांच्या रुग्णालयात नेले. डॉ. चव्हाण यांनी प्रेमसिंग चव्हाण यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, आंबादास भिका राठोड (वय २०) यांचा ६ एप्रिल रोजी सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा गावाजवळ वीज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच प्रेमसिंग चव्हाण यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे वरसाडे तांडयावर शोककळा पसरली आहे. या दोघांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.