नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात (Suprim Court) सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तानाट्य आता निर्णयाक टप्प्यावर पोहोचले आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं?, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. (Shivsena news)
जाणून घ्या…आतापर्यंत नेमकं काय घडलंय ?
सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. परंतू हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी शिवसेनेतील ठाकरे गटाने केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे, हे सर्व लेखी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच यासंदर्भातील सर्व याचिकादारांनी एकमेकांना त्या मुद्यांची टिप्पनी लेखी स्वरुपात देण्याचे न्यायालयाने म्हटले होते.
काय होणार आज न्यायालयात?
या सर्व घटनात्मक मुद्द्यासंदर्भात सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची केस 7 घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नबाम रेबीया केसमध्ये 5 न्यायाधीश होते. त्यामुळं 5 सदस्यीय घटनापीठ या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी मतदार आणि नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांनी देखील गेल्या सुनावणीत केली होती.
7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का ?
हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचं उत्तर मिळणार आहे. निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर करण्यात आलेली आहेत. आता प्रत्यक्ष सुनावणीला, युक्तीवादांना सुरुवात कधी होईल याचं उत्तर आयोगात मिळेल. धनुष्यबाण कुणाचा याचं उत्तर याच आयोगाच्या लढाईतून मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस महत्वाचा असणार आहे.