जळगाव (प्रतिनिधी) भाजप नेते गिरीश महाजन यांची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज अचानक त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोघेही एकाच वाहनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून केला जात असताना आज ना. गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ना. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. या पाहणीसाठी जामनेरमध्ये आले असता पाटील यांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठले. यावेळी महाजन यांनीही पाटील यांचं हसतमुखाने स्वागत केलं. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं अल्पोपहार घेतला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये गप्पाही झाल्या. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले. राज्य सरकार कोसळण्यावर भाजपकडून दावे केलेले जात असतानाच पाटील यांनी अचानक महाजन यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
आमच्या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आज अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा नाही. पालकमंत्री या नात्याने स्थानिक आमदारांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेणे, हा माझा हेतू होता. ज्या वेळेस राजकीय विषय असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात असू. परंतु, शेतकरी संकटात असताना एकमेकांतील मतभेद आणि राजकारण विसरून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगत ना. गुलाबराव पाटलांनी भेटी संदर्भातील चर्चेचे खंडन केले.
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, पण हे दु:ख खूप मोठं
राजकीय विषय नाही. चाळीसगावलाही आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकत्रं होतं. हा प्रश्न काही राजकारण करण्याचा नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करू, निवडणुका लढवू. पण हे दु:ख खूप मोठं आहे. संपूर्ण शेतकरीच नेस्तनाबूत झाला आहे. अनेक लोकांच्या घरावर पत्रं नाही. राहायला जागा नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आलो आहोत. हे कोणत्याही पक्षावरचं संकट नाही. हे सार्वजनिक संकट आहे. शेतकऱ्यांवरचं संकट आहे. त्यासाठी सर्वांनी मिळूनच काम केलं पाहिजे, असं महाजन म्हणाले.