मुंबई (वृत्तसंस्था) हाथरस येथील बलात्कार प्रकरणी उत्तरप्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली असून उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला आभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे घडले यासोबतच ज्या पद्धतीची वक्तव्ये जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचे सिद्ध होत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्या म्हणाल्या की, देशात अराजकता माजली आहे. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये मुली या सुरक्षित नाहीत.यासोबतच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस येथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जसे वर्तन करण्यात आले. या बद्दल योगी आदित्यनाथ यांनी स्वतःची चूक मान्य करावी.
योगींनी राजीनामा द्यावा
सुप्रिया सुळे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहेत. त्या म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याची चौकशी करण्याची विनंती मी पंतप्रधानांना करते. तसेच जर योगी सरकार हे राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.