मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून ते देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं” असं म्हणत निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. तसेच “याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला” असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच अजित पवारांवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. “अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’ म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला” असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का”, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. दोन दिवसापूर्वी अजित पवार इंदापुरात होते. अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेंच्या नुतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी बोलताना भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..? असा टोला हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता लगावला. तर इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही. बँक चालवता येत नाही. काय चाललंय, असा सवाल अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना केला.
“…तर एक दिवस हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही”
निलेश राणे म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितलं. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला होता. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली होती.