बीड (वृत्तसंस्था) “आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहचतो. हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही. हा मेळावा आहे भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा.” असं खासदार प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आज भगवान भक्तीगडावरील दसऱ्या मेळाव्यात बोलताना म्हणाल्या.
भाषण करु का नको करु? तुम्ही शांत राहिला तर कसं भाषण करणार? लांबलचक भाषणं करायला मला आवडत नाही. आवाज येत नाही? आपला आवाज फक्त बीड जिल्हा किंवा मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहोचतो आणि तुम्हाला माझा आवाज येत नाहीय? अशी कोटी प्रीतम मुंडे यांनी मारली.
सावरगावच्या गावकऱ्यांचं आभार व्यक्त करते. आज या मेळाव्याला येत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी इतकी अतिवृष्टी झाली की काही लोकांच्या मनात शंका होती की मेळावा होईल का नाही? किती मोठी होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या लोकांना सांगायचं आहे, जरा डोळे उघडून बघा. रसाळलेला जनसमुदाय बघा. हा भगवान बाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांचा प्रतिक असल्याचंही त्या म्हणाल्या.
आज दसऱ्याचा दिवस आहे, विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीचे अनेक रुप बघता येतात. देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रुप आपण बघतो. पंकजा ताई पालकमंत्री असताना हे मायावी, सोज्वळ आणि सहनशीलरुप आपण बघितलंय. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजात आराजकता पसरते, विषमता, अन्याय पसरतो तेव्हा तीच देवी दुर्गेचा अवतार घेऊन त्या अन्यायाला संपविल्याशिवाय राहत नाही. याचंसुद्धा हा विजयादशमीचा सण प्रतिक आहे. त्यामुळे मी आज सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतेय.
आज इथे आलेला प्रत्येक माणूस मनामध्ये अपेक्षा घेऊन आला आहे. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. कारण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाही. तर इथे आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेला, मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आज मंचावर उपस्थित राहिलेले मान्यवर, सकाळपासून आलेले तुम्ही सर्व मुंडे परिवाराचा भाग आहात. आपला मेळावा कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही. तर हा मेळावा प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे. इथे आल्यानंतर ऊर्जा मिळते, असं प्रीतम मुंडे यावेळी म्हणाल्या.
















