मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील लेखात संजय राऊत यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. असे एक आणीबाणीसदृश्य धोरण सध्या देशात राबवले जात आहे. काही झाले तरी सत्ता हवी व त्यासाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर चालले आहे,’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
‘आज देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, पण धर्माचे राज्य आहे काय?,’ असा खोचक प्रश्न राऊत यांनी सुरुवातीलाच उपस्थित केला आहे. ‘जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही लोकांना वाटते. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेत अडसर ठरलेले, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले,’ असा टोलाही त्यांनी हाणला आहे.