जळगाव (प्रतिनिधी) धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे रतनलालजी बाफनाजींचे निर्वाण झाले. दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे अचानक निरोप घेणे चटका लावणारे आहे. बाफनाजींच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले असल्याच्या शोकभावन जैन उद्दोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात श्री. जैन म्हटलेय की, बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररूपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरूपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये शाश्वत राहतील. माणसांवर, पशूपक्षी प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतिशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच आवडते होते.”शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे,” या सत्त्वशील विचाराच्या प्रचारासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. शालेय वयोगटापासूनच जीवन सदाचाराचा सर्वोत्तम संस्कार व्हावा,मुलांची जडणघडण उत्तम व्हावी याकरिताही त्यांनी खूप परिश्रम घेतले. आदर्श नेतृत्व,कर्तृत्त्व आणि दातृत्त्व याकरिता बाफनाजी कायम स्मरणात राहतील..नंदादीपाप्रमाणे! सकल जनासाठी कायम कार्यरत राहणे हाच विचार असल्याने श्रद्देय मोठे भाऊ आणि भाईसाहेब रतनलालजी यांचे ऋणांनूबंध अधिक घट्ट होत राहिले.
















