मुंबई (वृत्तसंस्था) आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर, शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे की, कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतरही मोदी सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं अखेर अकाली दलानं एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनंतर अकाली दलाच्या रूपानं भाजपचे सर्वात जुने व सुरुवातीचे दोन्ही मित्र पक्ष आता बाहेर पडले आहेत.
‘आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. ‘ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले. अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारण निस्तेज होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार?,’ असा सवालही शिवसेनेने केला आहे. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल,’ असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे.