जळगाव – (प्रतिनिधी) । शिधापत्रिकेसंदर्भात जळगाव तहसीलदार व एस. आय. ओ. यांच्या संगनमंताने भ्रष्ट्राचार करीत असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा संघटक शैलेश सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे .
निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे , शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेची प्रक्रिया तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्वतंत्र खोलीमध्ये सुरू करणेसाठी , शैलेश सपकाळे यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी लेखी अर्ज सादर केला होता . हा अर्ज तहसिलदार नामदेव पाटील यांनी पुढील कारवाईसाठी पुरवठा अधिकारी डी. बी. पाटील यांचेकडे स्वाक्षरी करून दिला आहे. त्या कारवाईस आज सुमारे एका वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुद्धा एकाही नागरिकांचे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी कोणतीही कायदेशीर व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही यातून जनतेची लूटमार सुरू झालेली आहे. यापूर्वी शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी ५००/- ते ७००/- रूपये मोजावे लागत होते. त्याऐवजी सद्यस्थितीत १५००/- ते २०००/- रूपये मोजावे लागत आहे. त्यासाठी धरणगाव व अमळनेर येथे नागरिकांना स्वत: जावे लागत आहे. असा अंधाधुंद व गलथान कारभार सुरू आहे. शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी नागरिकांना धरणगाव व अमळनेर येथे का जावे लागत आहे ? याची प्रत्यक्ष तहसिलदार नामदेव पाटील व पुरवठा अधिकारी डी.बी.जाधव या दोघी भ्रष्टाचारी अधिकारी यांना बोलावून त्यांचेकडे कसून चौकशी करावी. धरणगाव येथे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेचा आदेश हा कोणी कोणत्या अधिकारी किंवा मंत्री महोदय यांनी दिला आहे ? याची चौकशी करणे गरजेचे आहे. या गंभीर घटने मागे कोणाचा वरदहस्त आहे , याचा कसून तपास करणे गरजेचे आहे. तसेच जळगाव येथील तहसिल कार्यालयामध्ये दिवसाढवळ्या खुलेआमपणे तेथील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या दलालांमार्फत बेकायदशीर कामे करीत आहे. या विषयी पूर्वीच लेखी तक्रारी अर्ज सादर केला असून सुद्धा आजपावेतो कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नसून तहसिलदार श्री. पाटील हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. यातून ते बेकायदेशीर कामे करीत असलेचे स्पष्ट दिसून येत आहे. संबंधीत भ्रष्टाचारी तहसिलदार नामदेव पाटील यांचे विरूद्ध जनतेची फसवणूक करणे विषयी योग्य ती फौजदारी कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी अश्या भ्रष्टाचारी अधिकारी विरूद्ध वेळीच योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी. उडवाउडवीची व टाळाटाळीचे उत्तरे दिल्यास जळगाव येथील तहसिल कार्यालयातील अधिकारी यांचे विरूद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये कायदेशीरपणे याचिका दाखल करणेची तजवीज ठेवली आहे.असा इशारा देखील शैलेश सपकाळे यांनी दिलेला आहे.