पुणे (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे व साथीदारांकडे संविधानानुसार एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे त्यांनी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, नाहीतर सगळे बंडखोर आमदार म्हणून कायम राहण्यास अपात्र ठरू शकतात, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
बंडखोर आमदारांवर आदेश पाळण्याचे संविधानिक बंधन !
असीम सरोदे पुढे म्हणालेय की, संविधानातील 10 व्या शेड्युल मधील (a) चा दुसरा परिछेदात निर्णायक स्पष्टीकरण देणारा आहे. त्यानुसार- ज्या पक्षाने एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत उभे केले असेल, त्याच पक्षाचा तो आमदार असतो. 2/3 पेक्षा जास्त संख्येने आमदार शिवसेनेतून फुटून बंडखोर म्हणून बाहेर पडले तरीही त्त्या सगळ्या बंडखोर आमदारांना दुसऱ्या पक्षात सहभागी व्हावे लागेल. जोपर्यंत ते शिवसेना पक्ष सोडत नाहीत तोपर्यंत त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठरवून दिलेल्या प्रतोद व्यक्तीने (व्हीपने) दिलेले आदेश सुद्धा पाळण्याचे संविधानिक बंधन बंडखोर आमदारांवर आहे, असे सरोदे यांनी स्पष्ट केले.
सगळ्या बंडखोर आमदारांची आमदारकी धोक्यात
राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी मतदान करून बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपचे पालन केले नाही. त्यामुळे सगळ्या बंडखोर आमदारांची आमदारकी धोक्यात आलेली आहे. सगळे बंडखोर आमदार म्हणून कायम राहण्यास ‘अपात्र ‘ ठरवले जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत हे नक्की, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिवसेना कुणाची हे ठरविता येणार नाही
शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षातील 40 आमदार बंडखोर झालेत व त्यामुळे आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा एकनाथ शिंदे करू शकत नाहीत असे संविधानातील तरतुदी नुसार दिसते. म्हणजेच केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिवसेना कुणाची हे ठरविता येणार नाही हे वास्तव आहे. शिवसेना कुणाची याबद्दलचा वाद आधी निवडणूक आयोगाकडे येण्याची शक्यता आहे. जर निवडणूक आयोगाने निःपक्षपाती व शुद्ध संविधानिक भूमिका घ्यायचे ठरवले तर उद्धव ठाकरे यांचे पारडे कायद्याच्या दृष्टीने जड आहे.
…तर शिवसेना कुणाची हा सामना रंगणार
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून दोन गोष्टी नक्की घडणार त्या म्हणजे-शिवसेना कात टाकणार व नवीन स्वरूपात सक्रिय होणार, एकाचवेळी न्यायालय, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष सगळ्यांच्या निस्पृह व संविधानिक असण्याच्या विश्वासपात्रतेची परीक्षा होणार. सध्याच्या परिस्थिती नुसार व संविधानिक तरतुदींच्या अनुसार जर एकनाथ शिंदे व बंडखोर इतर पक्षात सहभागी झाले, नाहीत तर सत्तेला धक्का लागू शकतो व त्यांना पायउतार व्हावे लागेल. शिंदे व गट जर इतर पक्षात दाखल झाले तर शिवसेना कुणाची हा सामना रंगणार. एकूण राजकीय अस्थिरता बघता लवकरच निवडणुका होतील हा अंदाज बरोबर ठरेल असेच चित्र आहे, असेही सरोरे यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ‘सरकारनामा’ या पोर्टलने दिले आहे.