जळगाव (प्रतिनिधी) खावटीच्या खटल्यात तब्बल सहा वर्षानंतर न्यायालयात समोरा-समोर असलेल्या पती-पत्नीच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना आज जळगाव न्यायालयाच्या आवारातच घडली.
या संदर्भात अधिक असे की, शनिपेठेत राहणाऱ्या शिरीनबी यांचे लग्न फातेमानगरातील सय्यद अफसर सय्यद अख्तर यांच्याशी झाले आहे. कौटुंबिक वादामुळे गेल्या सहा वर्षांपासून दोन्ही विभक्त झाले आहेत. मधल्या काळात शिरीनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती अफसरसह त्याच्या कुटुंबांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच न्यायालयात खावटीसाठी मागणी केली असता ती मान्य करण्यात आली आहे. शिरीनबी यांच्या म्हणण्यानुसार पती अफसर हा सहा वर्षांपासून न्यायालयात हजर होत नाही, खावटीचे पैसे देखील देत नव्हता. अखेर बुधवारी न्यायालयीन कामाकाजासाठी तो हजर झाला. यावेळी त्याने न्यायालयाच्या बाहेरच पत्नीसह तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. पती अफसर याने दुसरे लग्न केल्याचा आरोपही शिरीनबी यांनी केला आहे. तर अफसर याने सांगीतल्यानुसार, न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात हजर झाल्यांनतर पत्नी शिरीनबीसह तिच्या कुटुंबियांनी बाहेरुन 15 ते 20 गुंड बोलावून घेत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अफसर याने केला आहे.