जळगाव (प्रतिनिधी ) । ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घेऊन अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
विजय सिंघल हे म्हणाले की, बनावट संदेश पाठवून खासगी व सार्वजनिक वीज कंपन्यांच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ही फसवणूक रोखण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अशी फसवणूक कशी रोखता येईल याबाबत महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच ॲपवर माहिती देण्यात आली आहे. महावितरणकडून ग्राहकांना जो एसएमएस पाठविला जातो त्यामध्ये मेसेज पाठविणाऱ्याचा नावात स्पष्टपणे एमएसईडीसीएल असा कंपनीचा उल्लेख असतो. महावितरण कधीही खासगी क्रमांकावरून एसएमएस किंवा व्हॉट्स ॲप संदेश पाठवत नाही. महावितरणची बिले ऑनलाईन भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर सुविधा असून लाखो ग्राहक तिचा वापर करत आहेत. पण महावितरण बिलासाठी एखाद्या नंबरवर अधिकाऱ्यास संपर्क साधण्यास सांगत नाही. महावितरण कोणालाही फोनवरून ओटीपी विचारत नाही. सायबर भामट्यांकडून पाठवलेल्या वैयक्तिक नंबरवर ग्राहकाने संपर्क साधला तर त्याला त्याच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा ताबा घेता येईल असे एनीडेस्क किंवा तत्सम ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते किंवा एखादी बनावट लिंक पाठविली जाते. त्याचा वापर करून भामटे ग्राहकाची बँकेविषयीची गोपनीय माहिती चोरतात आणि फसवणूक करतात. ग्राहकांनी ओटीपी शेअर केला नाही तर फसवणूक रोखण्यास मदत होईल. ग्राहकाने वीजबिल थकविले तर त्याचा वीजपुरवठा पूर्वसूचना देऊन खंडीत करण्याची महावितरणची नियमित पद्धती आहे. ताबडतोब बिल भरा नाहीतर रात्री वीजपुरवठा खंडित करू असे धमक्या दिल्यासारखे संदेश महावितरण कधीही पाठवत नाही. महावितरणचे तक्रार नोंदविण्याचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 तसेच 1800-212-3435 असा अकरा आकडी वेगळे क्रमांक आहेत. त्यावर मोफत फोन करता येतो. महावितरण कधीही ग्राहकांना एखाद्या व्यक्तीच्या खासगी मोबाईल क्रमांकावर फोन करण्यास सांगत नाही. दरम्यान, महावितरणच्या ग्राहकांची सायबर भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे समजले तर स्थानिक पोलीसांकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आली आहे.