मुंबई (वृत्तसंस्था) आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. परंतू बाहेर जात असताना त्यांच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये वाद पहायला मिळाला.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष दगडू कांबळे यांनी समीर वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवताना म्हटलं की, “समीर वानखेडेंना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं असेल तर त्यांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. समीर वानखेडेंना आजच चैत्यभूमीवर येण्याची गरज का भासली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेदेखील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधक आणि समर्थकांमध्ये वाद झाला.
यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. “बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले. “मी जो संघर्ष सुरु केला त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे,” असं वाटतं असंही ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.