मुंबई (वृत्तसंस्था) ‘हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत’ असे म्हणत शिवसेनेने सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा दाखल देत भाजपवरजोरदार टीका केली आहे. एवढेच नव्हे तर हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे.
मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणामुळे शिवसेनेला आयतीच संधी मिळाली आहे. भागवत यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्वाचा व्यापक अर्थ सांगितला होता. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार असल्याची भूमिका भागवत यांनी मांडली होती. तोच धागा पकडून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर शिवसेना गप्प का?, असे विचारणाऱ्या भाजपलाही शिवसेनेने सडेतोड उत्तर दिले आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे. ठाकरे यांनी त्या तकलादू भूमिकेची चिरफाड करत लक्तरे वेशीवर टांगली आहेत,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.
‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. भाजपचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत, असा टोलाही शिवसेनेने हाणला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार की नाही? तुम्ही हिंदुत्व सोडले आहे काय? तुम्ही सेक्युलर झालात काय? असे प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका.