मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून १० वी आणि १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली. राज्य सरकारच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हेलकावे खात असलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच खल झाला.
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा, अशी विनंती मी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच एमपीएससी परीक्षा देखील काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून खबरदारी म्हणून राज्य शासनाकडून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत