मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटसंदर्भात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल लवकरच निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी १२ आमदार हे तालिबानी किंवा गुंड नाहीत. राज्यपालांनी दबाव असेल तर तसं सांगावं, असं देखील राऊत म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावे. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्यानं वातावरण प्रसन्न होतं असं वाटतंय. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, असं वाटतंय”. राज्यापालांवर दबाव असेल तर त्यांनी सांगावं असं सांगत ते म्हणाले, “ते दबावामुळे निर्णय घेत असतील तर त्यांनी ते जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही. आणि तो जर होत असेल तर तो का होतो याचा विचार राजभवनाने करायला हवा. हायकोर्टाने या प्रकरणात पडण्याची गरज नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी देणं हे त्यांचं काम आहे. १२ आमदार हे तालिबानमधून आलेले नाही, ते गुंड नाहीत. ते कलाकार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण काम केलंय. त्यामुळे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. कालच्या भेटीनंतर राज्यपाल सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय”.
विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली असता त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.