पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन ५ वेगेवेगळ्या ठिकाणी ४८ तास अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी १४ जणांना अटक केलीये.
या प्रकरणात मशक कन्याल (वय २७), अकबर शेख (वय ३२), अझरुद्दीन अन्सारी (वय २७), नोएल खान (वय २४), आसिफ पठाण (वय ३६), प्रशांत गायकवाड (वय २९), रफीक शेख (वय ३२), राजकुमार प्रसाद (वय २९), गोलू (वय १९) आणि इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की, ३१ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता हा घटनाक्रम सुरू झाला. मुलीचे आई -वडील अत्यंत गरीब आहेत आणि पुण्यात अनेक वर्षांपासून नर्सरीमध्ये काम करत आहेत. त्या वेळी, कोणालाही न सांगता, अल्पवयीन आपल्या १९ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती ऑटोने पुणे स्टेशनला पोहोचली. बराच वेळ इथे उभे राहिल्यावर जेव्हा तिचा मित्र आला नाही तेव्हा ती रडू लागली. तिला रडताना पाहून एक ऑटो चालक तिच्याकडे आला. त्याने मुलीला स्टेशनबाहेर येण्यास सांगितले, तिचा मित्र तिला बोलवत असल्याचे तो म्हणाला. मुलगी अस्वस्थ होती आणि तिला वाटले की ऑटो चालक खरे बोलत आहे. यानंतर त्याने मुलीला बाहेर आणले आणि तिला पिण्यासाठी पाणी दिले. मुलीचे म्हणणे आहे की तिने पाणी प्यायल्याबरोबर तिला चक्कर आल्यासारखे वाटले.
सर्वप्रथम, मुलीला रिक्षात बसवलेल्या त्या ड्रायव्हरने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर, त्याने आणखी काही लोकांना बोलावले आणि मग प्रत्येकाने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. डीसीपी पाटील म्हणाले की, पीडित मुलगी सलग त्यांच्यासमोर ओरडत आणि हात जोडत होती. परंतु आरोपींने तिला कपड्यांशिवाय खोलीत बंद ठेवले. दर काही तासांनी एक नवीन व्यक्ती येऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. मुलगी सतत कपडे आणि अन्नाची मागणी करत होती, पण कोणीही तिच्यावर दया केली नाही. बलात्कारानंतर आरोपी तिला धमकावत होते की जर तिने बाहेर गेल्यानंतर कोणालाही काही सांगितले तर ते तिला ठार मारतील.
वडिलांनी सांगितले की, घरातून गेल्याच्या पुढच्या सकाळी त्यांना कळाले की, मुलगी घरात नाही. मुलीच्या मोबाईलवर फोन डायल केला, पण तो बंद होता. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली. तपास सुरू झाला आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे स्पष्ट झाले की मुलीचे अपहरण येथूनच झाले आहे. नम्रता पाटील यांनी सांगितले की प्रथम मुलगी ऑटोरिक्षात बसलेली दिसली.
ऑटो चालकाने मुलीचे अपहरण केले आणि एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या एका मित्राला बोलावून अल्पवयीन मुलीला त्याच्या स्वाधीन केले. यानंतर, मुलीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि इतर तीन लोकांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही त्याच हॉटेलमध्ये आणखी चार जणांनी पीडितेला आपल्या वासनेचा बळी ठरवले. त्यानंतर आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेले आणि तिथेही तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. पुण्यातील विश्रांतवाडी, विमान नगर, कोंढवा आणि इतर काही ठिकाणी १२ आरोपींनी मुलीवर बलात्कार केला.
मुलीवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती धोक्याच्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शारीरिक जखमा बऱ्या होऊ शकतात, पण त्याने जो मानसिक आघात केला तो कदाचित आयुष्यभर भरून निघणार नाही. मुलीचे कुटुंबीय फक्त एवढेच सांगत आहेत की आम्ही आधीच अस्वस्थ आहोत, आमच्याशी बोलून आमचा त्रास वाढवू नका. डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की हे खरोखरच अंगावर काटा आणणारे प्रकरण आहे.
















