जळगाव (प्रतिनिधी) शेतकर्यांच्या हितासाठी शिंगाडे मोर्चे काढण्यासाठी ख्यात असलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आता जिल्ह्याची धुरा हाती असतांना शेतकर्यांना कृषी वापरासाठी अडचण येऊ नये म्हणून यंदा तब्बल १५ कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केली आहेत. दोन वर्षात विक्रमी ३१ कोटींच्या कामांना मान्यता देऊन ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी हिताचा वसा जोपासल्याचे दाखवून दिले आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात शेतीचे पंप वारंवार जळत होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उद्भवत राहते, घरगुती ,शेती पंप व पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीज पुरवठा पूर्ण दाबाने सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचेकडून नवीन ट्रांसफार्मर बसविण्याबाबत, खराब झालेले इलेक्ट्रिक पोल बदलुन मिळणेबाबत, अपघात होऊ नये म्हणून केबल ची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. ना. गुलाबराव पाटील यांनी याची दखल घेऊन शेतकर्यांच्या सर्वात महत्वाच्या समस्येचे निराकरण केले आहे.
सन २०१८ – १९ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत म्हणजेच डीपीडीसी अंतर्गत या कामांसाठी केवळ २ कोटी रुपये मंजूर होते मात्र मागील वर्षापासून वीज समस्यांची पूर्णपणे जाण असलेले पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेऊन मागील वर्षी सदर १९४ कामांसाठी १६ कोटी ५५ लक्ष निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता. तर यावर्षी तब्बल ३०९ कामांसाठी १४ कोटी १२ लक्ष ६९ हजाराचा निधी मंजूर केला असून निधी वितरित करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत.
मागील काळात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निधीअभावी अनेक अडचणींना सामोरे जाताना पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच अधीक्षक अभियंता श्री शेख यांनी जिल्ह्यात पूर्ण दाबाने व सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी तब्बल २ ते ३ वेळा तालुकानिहाय बैठका घेऊन लोकप्रतिनिधींकडून समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच मागील महिन्यात झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत खासदार आमदार व सर्व लोकप्रतिनिधींना प्रस्ताव सादर करण्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार यावर्षी या वर्षी ३०९ कामांबाबत १४ कोटी १२ लक्ष साठ हजार मागल्या वर्षी १४ कोटी ५५ लक्ष असे २ वर्षात सुमारे ३१ कोटी रुपये निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे. तसेच उर्वरित प्रस्ताव देखील मे पर्यंत मंजूर करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले असल्याचेही ना पाटील यांनी सांगितले.
तालुकानिहाय मंजूर कामे
ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अमळनेर – मंजूर कामे १३ : निधी ६४.१०८ लक्ष ; भडगाव – ११ कामे : ५२.७९० लक्ष ; पाचोरा – २१ कामे : ११६.४३१ लक्ष ; भुसावळ -२१ कामे : ८९.४५८ लक्ष ; बोदवड – २५ कामे – १०८.९८९लक्ष ; मुक्ताईनगर – १२ कामे : ५३.८८५ लक्ष ; चाळीसगाव – १० कामे : ४६.५४७ लक्ष ; चोपडा – २० कामे : ९५.४०८ लक्ष ; धरणगाव – ५४ कामे : २०२.३८० लक्ष ; जळगाव – ४७ कामे : २४८.८८८लक्ष ; जामनेर – १८ कामे : ८६.२८१ लक्ष ; एरंडोल – १० कामे : ६०.५८२ लक्ष ; पारोळा – ८ कामे : ३९.३७२ लक्ष ; रावेर- २८ कामे : ९७.०९३ लक्ष ; यावल – ११ कामे : ३९.८६१ लक्ष
शेतकरी हित सर्वतोपरी !
या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असून त्याच्यासाठी वीज हा जीव की प्राण आहे. पुरेशा विजेअभावी शेतकर्यांची को्ट्यावधीची हानी होत असते. यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्षात तब्बल ३१ कोटी रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे.