राजस्थान (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वीज पडल्याने राजस्थानातल्या जयपूरमध्ये आमेर महलाच्या टॉवरवर वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेशात चित्रकूट, उन्नाव, प्रयागराज, फिरोजाबाज आणि कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी वीज कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानातली घटना ही आजवरची सर्वात धक्कादायक घटना मानली जात आहे. आमेर महलच्या टॉवरवर वीज कोसळून झालेल्या मृतांमध्ये तरुणांचा आकडा अधिक होता. किल्ल्याजवळच्या डोंगरावर हे तरुण वातावरणाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांच्यापैकी काही लोक टॉवरवर सेल्फी घेत होते, तर काही लोक तिथेड डोंगरावर होते. याच टॉवरवर वीज कोसळली आणि ही दुर्दैवी घटना घडली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वीज कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, “कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारांमध्ये आज वीज कोसळल्यामुळे दुर्दैवी घटना घडली. पीडित कुटुंबियांबद्दल मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो, देव त्यांना या दुखातून सावरण्यासाठी शक्ती देईल. पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.” मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
राजस्थानमधील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. यामुळे दुःख झालं आहे. मृतांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.”