नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Corona Virus Omicron) संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. तो आता भारतातही येऊन पोहोचला आहे. त्यातच कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे चिंतेत वाढ झाली. देशात गेल्या २४ तासांत ७ हजार १८९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर ३८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांमध्ये ७१८९ कोरोनाबाधित आढळले आहेत. काल, भारतात ६६५० कोरोनाबाधित आढळले होते. मागील २४ तासांमध्ये ३८७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, ७२८६ बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनावर आतापर्यंत ३,४२,२३,२६३ बाधितांनी मात दिली आहे. सध्या देशात ७७,०३२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
देशात दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर मागील ८२ दिवसांपासून २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर ०.६५ टक्के आहे. तर, आठवड्याला पॉझिटीव्हीटी दर ०.६० टक्के आहे. मागील ४१ दिवसांपासून हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एका बाजूला कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे लसीकरण मोहिमेतही वाढ झाल्याचे दिसते. देशात सध्या १४१.०१ कोटी डोस देण्यात आले आहेत.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी १४१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराहून अधिक नोंदवण्यात येत आहे. नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढेल असे म्हटले जात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख १ हजार २४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६९ टक्के आहे.
देशात ४१५ ओमायक्रॉन बाधित
देशात आतापर्यंत १७ राज्यांमध्ये ४१५ जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यापैकी ११५ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही.