सांगली (वृत्तसंस्था) बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मामी आणि भाचा असे दोन जण जागीच ठार झाले. अश्विनी शीतल पाटील (वय ३५, रा. सिद्धेश्वर मंदिरजवळ, बुधगाव) आणि राघव रमेश पाटील (वय १ वर्षे, रा. बिसूर, ता. मिरज) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. बुधवार दि. २४ रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, प्रवासी रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील दहाजण जखमी झाले.
जखमींमध्ये ललिता ज्ञानदेव पाटील, कावेरी रमेश पाटील, पौर्णिमा शैलेंद्र सावंत, सारिका शेखर पाटील, अश्विनी शीतल पाटील यांच्यासह स्वरा रमेश कोकाटे, समृद्धी शैलेंद्र सावंत, जयदीप शेखर पाटील, अवधूत शैलेंद्र सावंत, राघव पाटील या मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपास्थित असणाऱ्या नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. परंतू दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील या दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातप्रकरणी रिक्षा चालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षा चालक महेश शिवाजी ओंकारे (रा. बिसूर) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
सध्या बुधगावचे ग्रामदैव सिद्धेश्वराची यात्रा सुरू झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची वर्दळ आहे. बुधवार दि. २४ रोजी रात्री रिक्षा चालक अरविंद पवार याच्या रिक्षा (एमएच १० के ४९५२) मधून दहा ते बारा जण जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते. रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते. तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा (एमएच १० सीक्यू २७६८) येत होती. मालवाहतूक रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत प्रवासी रिक्षा उलटली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.