जालना (वृत्तसंस्था) शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad ) यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे. भाजप (Bjp) ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपील दहेकर यांनी ही घोषणा केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन हा वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या कथित वक्तव्यानंतर जालन्यात आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे जिथे कुठे जितेंद्र आव्हाड असतील त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देत जो कोणी आव्हाड यांची जीभ कापेल त्याला दहा लाख रुपये बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली.
दरम्यान, अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आले आहे. 1669 साली दुष्काळ होता तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.