शहादा (प्रतिनिधी) तालुक्यातील विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मालवाहू रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हेमराज अंजने (वय ३९), मनोज घाट्या (वय ४२,दोघं रा.सुरत) व भगवान भाई गोविंद पंचुले (वय ४८ रा.गोंदिया, मध्यप्रदेश), अशी या अपघातातील तिघां मयतांची नावे आहेत.
रविवारी सकाळी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास शहादाकडून प्रकाशाकडे जाणारी मालवाहू रिक्षा प्रकाशानजीक आली असता कोकणामाता मंदिराजवळ समोरून आलेल्या भरधाव ट्रकवर धडकली. ट्रक भरधाव असल्याने रिक्षाच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामुळे पुढे बसलेले तिघेजण चेपले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काढतानादेखील मदत करणाऱ्यांच्या थरकाप उडत होता. हा अपघात इतका भीषण हाेता की, घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. अगदी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रकमध्ये अडकलेल्या छोट्या मिनी ट्रकला बाहेर काढावे लागले अशी परिस्थिती होती.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक दोघेही फरार झालेले आहेत. तर मालवाहू रिक्षा चालक गोलूभाई व अनिकेत अंतिम (दोघं रा.हिरापूर,मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.