जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण ट्रॅक परिसरात दुचाकी अपघातानंतर २३ वर्षीय तरूणाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जबरी हिसकावून फरार झालेल्या चार जणांपैकी दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) हे त्यांच्या दुचाकीने मेहरुण ट्रॅकवर जात असताना दुचाकीने (एमएच १९, डीयू ४६१०) धडक दिली होती. अपघात करणाऱ्या व त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेल्या एकूण चार जणांनी तारीक खाटीक यांना अपघाताच्या कारणावरुन मारहाण करुन २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ५०० रुपये किमतीचे ब्ल्यू टुथ, एक हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ व रोख ६०० रुपये असा एकूण २७ हजार १०० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने घेऊन पळून गेले होते. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना हा गुन्हा रामेश्वर कॉलनी परिसरातील काही तरुणांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुल नाना राजपूत (२३) रितेश भिकन चौधरी (१८) दोन्हा रा. रा. रामेश्वर कॉलनी यांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरेलील दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या दोघांसोबत असलेले दोन जण फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ इम्रान बेग, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केली.