मुंबई (वृत्तसंस्था) | एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. एकनाथ शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनाला वाट मोकळी करून दिली.
‘शिंदे साहेब गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही. हीच आमची निष्ठा, 35-35 वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.
‘आमची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. पाच आमदार गेले ठीक आहे. 40 आमदार सोडून जात आहे. अरे 25-25 वर्ष आमदार राहिलेले लोक सोडून जात आहे. मंत्रिपद सोडून जात आहे तरी आमची किंमत नाही. तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यानो परत या, मातोश्रीवर या. या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
‘आम्हाला जे मिळालं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने केलं आहे. आम्ही बंड केलं नाही तर उठाव केला आहे. आम्ही हिंदुत्त्वाशी तडजोड केली नाही. मला टपरीवर पाठवण्याची धमकी दिली जात आहे. आमचे मुख्यमंत्री हे रिक्षा चालक होते. ज्यांना कुणाला काही करत येत नव्हतं, अशा माझ्या सारखा असंख्य नेते आमदार झाले, ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशिर्वादांमुळे झाले आहे, असं पाटील म्हणाले.