जळगाव (प्रतिनिधी) पोलीस अधिकाऱ्याने केलेले आरोप आणि गृहमंत्र्यांनी दिलेले उत्तर हे मी काही वेळापूर्वी माध्यमातून पाहिली आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची आक्षेपानंतर बदली केली जात असेल आणि त्यानंतर जर असे आरोप पोलीस अधिकऱ्याकडून होत असतील तर ते आकसापोटी असू शकतात. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय तो खुलासा करतील. असे मत राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे.
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यांवरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, या प्रकाराबाबत मला माहिती नाही, परंतु हे मी टीव्हीवर पाहत आहे. याबाबत मंत्री देशमुख यांनी दिलेले उत्तरही मी ऐकले आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोप झाले अथवा त्याची बदली झाली की आकसापोटी असे आरोप ते करीत असतात मात्र, याबाबत चौकशी होऊन सत्य काय ते निश्चित बाहेर येईल.
जळगाव मनपामध्ये गेल्या अडीच वर्षात भाजपची सत्ता होती. मात्र, या काळात पालिकेकडून कोणतीही प्रमुख विकासकामे करण्यात आली नसल्याने नागरिक आणि नगरसेवक नाराज असल्याचं पाहायला मिळाले होते. त्याचा परिणाम म्हणून २७ नगरसेवक स्वतःहून भाजप सोडून बाहेर पडतात. याचं भाजपाने आत्मचिंतन केले पाहीजे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचं हे अपयश आहे. मात्र, सत्तेत असताना महाजन यांच्या अहंपणामुळे हे सर्व घडलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.